News | सुसरी नदीवरील संकल्पित धरणास आदिवासींचा विरोध

डहाणू, २५ ऑक्टोबर/ वार्ताहर
डहाणू तालुक्यातील सुसरी नदीवर धरण बांधण्यात येणार असून, त्यामुळे शेकडो आदिवासी कुटुंबांना विस्थापित करावे लागणार आहे. त्यामुळे या धरणाला जोरदार विरोध करून कोणत्याही परिस्थितीत हे धरण होऊ द्यायचे नाही, असा निर्धार येथील आदिवासींनी श्रमजिवी संघटना व समाजमित्र मानव विकास संघटनेच्या मदतीने केला आहे. हे धरण बांधल्यास त्याचा फटका आवढाणी, रानशेत, धानिवरी, महालक्ष्मी या गावांना बसणार असून, तेथील हजारो कुटुंबे विस्थापित होणार आहेत. या धरणासाठी एम.एम.आर.डी.ए.ने २०२ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. येथील धरणाला आदिवासींनी विरोध केल्याचे पाहून आवढाणी (गावठाण पाडा) येथे श्रमजिवी संघटना आणि समाजमित्र मानव विकास संघटना यांच्या पुढाकाराने एक सभा आयोजित केली होती. त्यावेळी येथील आदिवासींनी या धरणाला जोरदार विरोध करून आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
डहाणू तालुक्यात यापूर्वी सूर्या प्रकल्प, दापचरी प्रकल्पासाठी हजारो कुटुंबे विस्थापित झाली. त्यांना देशोधडीला लावले. त्यांचे पुनर्वसन चंद्रनगर, हनुमाननगर, नवी दापचरी येथे सांगण्यापुरते करण्यात आले. तेथे त्यांना अद्यापी कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पिण्याचे पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा किंवा त्यांच्या नावावर जमिनीही करण्यात आलेल्या नाहीत, अशी टीका आदिवासींनी केली.

original link - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=110544:2010-10-25-20-11-46&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 

No comments:

Post a Comment